Sunday, March 27, 2016

रण ऑफ कच्छ




गुजरात राज्याने पर्यटनाच्या क्षेत्रात प्रयोग सुरू केल्यानंतर कच्छच्या वाळवंटात पर्यटकांचे लोंढे येऊ लागले. मात्र याच कच्छच्या रणात त्याही आधीपासून एका निसर्गवेडय़ाने अनेकांना भटकवायला सुरुवात केली होती. जुगल तिवारी त्याचं नाव. मूळचा राजस्थानचा. बीएनएचएसने नॅचरलिस्ट म्हणून त्याला येथे नेमलं. आठएक वर्षे येथे काम केल्यावर त्याच्या लक्षात आलं, येथे खूप काही करण्यासारखे आहे. मग तो मोटी विराणीला स्थायिक झाला. गावासाठी काहीतरी करायचं त्याच्या डोक्यात होतं. परिसरातील वन्यजीवनचा अभ्यास केला. या भागात येणाऱ्या वन्यजीव प्रेमींना त्याने भटकवायची सुरुवात केली. चारी धांड, लायलरी रिव्हर बेड अशा आडवाटेवरच्या ठिकाणांना तो घेऊन जाऊ लागला.

चारी धांड (धांड म्हणजे पाणी) तलावाच्या आसपास हजारोंच्या संख्येने येणारे कॉमन क्रेन्स हे आकर्षणाचे केंद्रबिंदू होऊ लागले. ४० ते ६० हजारांच्या घरात येणारे हे अडीच तीन फूट उंचीचे पक्षी दिवसभर जमिनीवर चोचीने टकटक करत असतात. पाऊस आल्यावर उगवणारे हिरवे कोंब. चोच खुपसून या कोंबातून बी बाहेर काढायचं आणि ते फोडून त्यातील दाणा खायचं काम ते करतात. दिवसाला २५० ग्रॅम दाणे त्यांना लागतात. उरलेला कचरा तेथे येणारे लार्क पक्षी फस्त करतात. त्यांच्यामुळे जमीन चारपाच इंच खोल खणली जाते, नैसर्गिरीत्या नांगरली जाते. सुपीक होते. पुढच्या वर्षी पुन्हा कोंब येतात. येथे एक अनोखी जीवनसाखळीच तयार झाली आहे. गोडय़ा पाण्यावरील अनेक प्रकारचे वेडर्स आणि शिकारी पक्षी येतात. हे सारं चारी धांडवर पाहता येतं.

चारी धांड जवळच्याच फुले या गावी ग्रे हायपोकेलिस पक्ष्यांची भारतातील एकमेव जोडी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये येते. येथून जवळच आठ किलोमीटर्सवर लायलरी रिव्हर बेड आहे. हा डेड रिव्हर बेड आहे. त्यातील व्होल्कॅनिक फॉर्मेशन पाहण्यासारखे आहे. विविधरंगी आणि आकाराचे नमुने पाहता येतात. अगदी दिवसभर आरामात येथे भटकता येते.


सरकारी रणोत्सवात हे काहीच नसते. प्रसिद्ध वाईल्डलाइफ डेस्टिनेशनवर खंडीभर पर्यटक येत असतात. येथे मात्र फक्त आपणच असतो. तेदेखील जुगलमुळे. याच भटकंतीत कच्छचे प्रसिद्ध व्हाईट रणपाहता येते. कोणे एकेकाळी येथे समुद्र होता, तो भूगर्भात खेचला गेला. दरवर्षी पाऊस पडून गेल्यावर सुकल्यानंतर हजारो किलोमीटरचा केवळ मिठाचा पांढरा पट्टा येथे दिसतो. हे सारं आवर्जून पाहावं अस आहे, आणि गेल्या काही वर्षांत हे पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होत असते. परतीच्या प्रवासात मानवाच्या आदिम पाऊलखुणांचे भुजपासून ३०० किलोमीटरवर असणारे धोलावीरा पाहता येते. केव्हा जाल : नोव्हेंबर ते मार्च. हे सर्व पाहण्यासाठी साधारण चार दिवस पुरतात. प्रवासाचा कालावधी वेगळा. कसे जाल : रेल्वेने किंवा विमानाने भुजपर्यंत. मोटी विराणी भुजपासून ४५ किलोमीटर्सवर आहे. आत्माराम परब 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails